दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री. सुभाष सुरेशचंद्र देशमुख उर्फ बापू हे भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ व प्रमुख सदस्य. मृदुभाषी स्वभाव, संवाद साधण्याची कला, सर्वांना जोडून घेण्याची वृत्ती, संघटन कौशल्य, उत्तम निर्णयक्षमता या गुणांमुळे बापूंना नेहेमीच कार्यकर्ते व जनतेचा विश्वास आणि उत्तम पाठिंबा लाभला आहे. आपल्या कार्यकाळात भूषविलेल्या विविध मंत्रीपदी त्यांनी नेहमी जनहिताचे निर्णय घेतले व विविध शासकीय योजनांद्वारे महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.
महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र समृद्ध करणे आवश्यक आहे. सहकारी संस्था या सर्वसमावेशक असल्याने सामान्य जनतेच्या प्रत्यक्ष सहभागातून त्या उभ्या रहात असतात. मर्यादित कंपन्यांचे मालकी हक्क हे केंद्रीकृत असतात परंतु सहकार तत्वावर चालणार्या व्यवसायामध्ये अनेकांचे सहकार्य लाभत असल्याने विकासाचा, प्रगतीचा वेग हा अधिक असतो. अनेक जणांच्या एकत्र येण्यातून विविध विचार, कल्पना पुढे येतात, त्यातून अधिक चांगला विकल्प निवडणे सोपे होते. अनेक लोकांच्या एकत्र येण्यातून बळकट भाग भांडवल उभे राहू शकते. प्रत्येक माणसामध्ये काही गुणवैशिष्ट्ये असतात. सहकार तत्वावर संस्था उभ्या राहतात तेव्हा विविध व्यक्तींच्या विविध गुणांचा लाभ त्या संस्थेला होत असतो. पैसा, बुद्धी, कष्ट अशा विविध दृष्टिकोनातून हा सहभाग लाभदायक होत असतो. अनेक कुटुंबे व कुटुंबातीत प्रत्येक सदस्यांचा सहभाग हा फायदेशीर ठरत असतो. या प्रत्येकाला हा आपला व्यवसाय वाटतो. विशेषतः ग्रामीण भागाला समृद्ध करण्यासाठी सहकार क्षेत्र वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. सहकार खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर सुभाष(बापू) देशमुख यांनी सहकार क्षेत्र बळकट करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रामध्ये कृषी व त्या खालोखाल वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तरुणांना या संधीची ओळख व्हावी व अधिकाधिक तरुणांनी या संधींचा लाभ घ्यावा यासाठी विविध योजना व उपक्रम यांच्या मार्फत सुभाष(बापू) देशमुख प्रयत्न करीत आहेत. आपल्या येथे मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होते. परंतु उत्पादित झालेल्या कापसापैकी फार कमी कापसावर येथे प्रक्रिया होते. येथे पिकणार्या कापसावर येथेच प्रक्रिया केलली जावी हे वस्त्रोद्योग विभागाचे लक्ष्य आहे. कापूस उत्पादनापासून रेडिमेड गारमेंट्स बनविण्यापर्यंत अनेक उद्योग येथे निर्मिले जाऊ शकतात त्यांना मेक इन इंडिया, स्टार्ट अप सारख्या योजनांची जोड देत तरुणांना, महिलांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे लक्ष्य होते.
पणन विभाग हा विक्री तसेच मार्केटिंग या बाबींशी संबंधित आहे. विशेषतः शेती उत्पादने व कृषिउद्योग उत्पादनांची विक्री व पणन यांद्वारे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सुभाष(बापू) कार्यरत राहिले. कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटिंग फेडरेशन यांच्या माध्यमातून शेतकर्यांेच्या शेतीमालाच्या विक्रीची व्यवस्था करणे, मालाला योग्य हमीभाव मिळवून देणे यांसारख्या बाबी या विभागातर्फे नियंत्रित केल्या गेल्या. या क्षेत्रातील त्रुटी दूर करून व्यवस्था सुरळीत राखणे हा बापूंचा प्राथमिक अजेंडा होता. शेती व शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक. त्यांची समृद्धी म्हणजेच समृद्ध अर्थव्यवस्था. अधिकाधिक तरुणांनी शेतीकडे वळावे व शेतीला वैभव प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.
सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुभाषबापूंनी सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. राज्य व केंद्र सरकारच्या जनहिताच्या योजना कोणत्याही परिस्थितीत समाजातील अखेरच्या घटकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, यामध्ये हयगय होता कामा नये. हा दृष्टिकोन ठेवून काही ठोस निर्णय घेतले. सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि सांगली जिल्हा कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा, अशा सर्वच क्षेत्रात विकासाच्या सर्व टप्यांवर अग्रेसर ठेवण्यासाठी ते नेहेमीच कटिबद्ध राहिले. पालकमंत्री म्हणून काम करीत असताना निधीचा योग्य वापर, अखर्चित निधी व्यर्थ जाऊ न देता त्याचा विनियोग, सांगलीत १६८ कोटींची कर्जमाफी, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भरीव कामगिरी, दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना अशा अनेक बाबींमधून सांगली जिल्ह्याची प्रगती साधण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सर्व जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडण्यासाठी ते सदैव तत्पर होते.
सोळा वर्षे कंत्राटदारीच्या कामांचा व्यवसाय व बरोबरीने समाजकार्य यामध्ये श्री. सुभाष देशमुख उर्फ बापू यांनी नाव मिळविले होते. आतापावेतो बापूंना राजकीय कार्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थेचे, राजकीय पक्षाचे सदस्यही नव्हते. १९९८ साली जानेवारी महिन्यात सोलापूर स्थानिक स्वराज्य संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातर्फे एक खंबीर, लोकप्रिय नेतृत्व म्हणून सुभाषबापूंचे नाव निश्चित करण्यात आले. सामाजिक दृष्टी, गोरगरिबांच्या अडचणी समजून घेण्याची वृत्ती यांमुळे बापूंना मोठा जनाधार लाभला. या निवडणुकीत प्रचंड मताधिक्यासह विजय प्राप्त करत बापूंनी आमदारकी मिळविली व येथे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा शुभारंभ झाला.
राजकीय प्रवासबापूंच्या नेतृत्व गुणांवर भारतीय जनता पक्षाने नेहेमीच विश्वास दाखविला व आजवर बापूंनी पक्षातर्फे पाच वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणुका लढविल्या आहेत तसेच त्यांना विधानपरिषद सदस्य, लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य असे तीन सभागृहाचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे.
बापूंनी सर्वप्रथम जानेवारी १९९८ मध्ये सोलापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवत आमदारकी प्राप्त केली. तर २००४ साली लोकसभेची निवडणूक जिंकून त्यांनी लोकसभा सदस्यत्व स्वीकारले. विविध निवडणुकांमधून बापूंना नेहेमीच मोठे मताधिक्य लाभले. ७ जुलै २०१६ रोजी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेत बापूंनी सहकार, पणन व वस्त्रोद्योग या खात्यांचा पदभार स्वीकारला. ऑक्टोबर २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम यश मिळवत पुन्हा एकदा आमदार म्हणून विजय प्राप्त केला.
ग्रामीण वित्त, कृषी पणन, औद्योगिक सहकार, बाजार नियामक आणि पैसे कर्जाऊ देण्यासारख्या बाबींशी संबंधित असणारा सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, कृषी-औद्योगिक अर्थकारण आणि विशेषत: ग्रामीण पत क्षेत्रात नेहेमीच महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या सामाजिक व राजकीय दोन्ही कारकीर्दीमध्ये बापूंनी जनहिताला सदैव प्राधान्य दिले. राज्यातील सहकार क्षेत्र, कृषी उत्पादन पणन क्षेत्र आणि वस्त्रोद्योग क्षेत्राच्या प्रशासन आणि संनियंत्रणासाठी बापूंनी लक्ष्य केंद्रित केले. पदभार स्वीकारल्यानंतर जनहिताचे तसेच शेतकरी हिताचे अनेक निर्णय त्यांनी विनाविलंब घेतले. यामध्ये सातबारा धारक शेतकर्यांना वि. वि. सोसायट्यांचा सभासद करून घेण्याचा आदेश, संचालकांची मालकशाही मोडीत काढण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत मतदानाचा अधिकार यांसारख्या महत्वाच्या निर्णयांचा समावेश होतो. या क्षेत्राला सक्षम करणे, सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे व महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणे यासाठी बापू सदैव कार्यरत आहेत.
१९९८ सालच्या जानेवारी महिन्यात सोलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते युन्नुसभाई शेख यांचा पराभव करून आमदार म्हणून विजय मिळविला.
२००० साली सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. बापूंच्या समर्थ नेतृत्वाला मिळणारी लोकप्रियता व मजबूत जनाधार पाहता बापूंना पक्षाकडून ही जबाबदारी देण्यात आली.
२००० साली सोलापूर तरुण भारतच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली.
२००४ साली महाराष्ट्र सहकार आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली.
२००४ साली लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व व भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी सौ. उज्वलाताई शिंदे यांचा पराभव करून लोकसभा सदस्य म्हणून विजय प्राप्त केला.
२००९ साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरदचंद्र पवार यांना कठीण लढत देत मोठ्या संख्येने मते मिळविली. बापूंना मजबूत जनाधार मिळत असल्याचेच हे प्रतीक होय.
२००९ साली विधानसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद, तुळजापूर विधानसभा मतदार संघामध्ये कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी दुग्धविकासमंत्री श्री. मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात अटीतटीची निवडणूक लढविली.
२०१४ साली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाकडून सोपविण्यात आली.
२०१४ साली कॉंग्रेसचे विद्यमान आमदार श्री. दिलीप माने यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विधानसभेत आमदार म्हणून विजय प्राप्त केला.
७ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग खात्यांसाठी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
१७ जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विद्यमान सहकार खात्याच्या प्रभारासह, मदत व पुनर्वसन या खात्यांसाठी कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार बाबा मिस्त्री यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विधानसभेत आमदार म्हणून विजय प्राप्त केला.